16/08/2023
*मना तळमळसी..! लेखांक 10.*
मुलांचा *"व्यक्तिमत्त्व विकास"* हा विषय आज-काल मुला-पालकांच्या मानगुटीवर भुतासारखा बसलेला दिसतो. आपण मुलांसाठी, जास्तीत जास्त काय काय करू शकतो, कोणकोणत्या सोयी सुविधा त्यांना आपण पुरवू शकतो, त्यांच्यासाठी किती पैसे खर्च करू शकतो, हे प्रश्न म्हणजे आपल्या मुलांवरील प्रेमाच्या फूटपट्ट्या झाल्या आहेत. या सर्व भौतिक सोयीसुविधा, महागडे क्लासेस, सुट्टीतील छंदवर्ग, या गोष्टींपुरतेच फक्त, आपले त्यांच्या विकासासाठीचे प्रयत्न मर्यादित आहेत का? आणि हे केलेले प्रयत्न पुरेसे आहेत का? या प्रश्नांच्या उत्तरासाठी मुळातूनच मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया समजून घ्यायला पाहिजे.
बरेचदा आपल्याला, *'व्यक्तिमत्त्व'* या शब्दाचे नीट असे आकलन झालेलेच नसते. काही ढोबळ कल्पना आपण मनात धरून चालतो. काही जण माणसाच्या बाह्य रूपालाच व्यक्तीमत्व असे म्हणतात. काही जणांना असे वाटते की, अनेक गोष्टी अवगत असणे म्हणजे चांगले व्यक्तिमत्त्व. म्हणून मग मुलांना अनेक गोष्टी शिकवण्याचे अट्टहास दिसतात. स्केटिंग, गिटार, चित्रकला, गायन, तबला, वक्तृत्त्व, पोहोणे, पियानो, आणि जोडीला पुन्हा शाळेचा अभ्यास असतोच. अशा भारंभार क्लासेसना दिवसभर हजेरी लावून, मुलांचे चिमुकले शरीर, चिमुकला मेंदू, आणि चिमुकले मन, अगदी पार शिणून, दमून जातात. इतके की, शेवटी एवढं सगळं करूनही, मुलांच्या पदरात काहीच पडत नाही.
चटपटीत इंग्रजी बोलता येणे, आणि नवीन माणसांशी धीटपणे संवाद साधता येणे, म्हणजे चांगले व्यक्तिमत्व, असे काहींना वाटते. त्यातूनच मग ...
"कॉन्व्हेंट मधली मुलं कशी स्मार्ट होतात, त्या मानाने मराठी शाळेतील मुलं अगदीच घाटी वाटतात नाही"
-असे सार्वत्रिक गैरसमज पसरतात. या सर्व गोष्टी व्यक्तिमत्त्वात समाविष्ट असतातच. पण अशी एखादीच गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्त्व, असे म्हटल्यास, आंधळे आणि हत्ती या गोष्टी सारखे होईल. व्यक्तिमत्त्व ही तशी खूप व्यापक संकल्पना आहे. तांत्रिक व्याख्येत न अडकता, आपण ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करू.
*"व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक अशा सर्व वैशिष्ट्यांचा संच म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व."* या संचात शारीरिक वैशिष्ट्यांचा समावेश असतोच. पण त्यांना अगदी थोडे महत्त्व असते. व्यक्तिमत्त्वातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे व्यक्तीच्या वर्तन वैशिष्ट्यांचा. माणसाच्या एकूणच क्रियात्मक, आणि प्रतिक्रियात्मक वर्तन वैशिष्ट्यांचा संच, म्हणजे माणसाचं व्यक्तिमत्त्व असं म्हणता येईल.
आपल्या आसपासच्या लोकांशी माणूस कसा वागतो, समूहात त्याला इतरांशी जमवून घेता येतं का? अनोळखी माणसांशी सामना झाल्यास त्याची वागण्याची पद्धत कशी असते? जेव्हा मनाविरुद्ध घटना घडतात तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असते? ताणतणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगात तो कसा वागतो? त्याला स्वतःच्या भावना नीटपणे स्पष्ट शब्दात व्यक्त करता येतात का? या सगळ्या गोष्टी नीटपणे करता येणे हे विकसित व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे.
मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची सर्वात मोठी शाळा म्हणजे घर. आणि त्यासाठी तयार, उपलब्ध असणारी 'आदर्श मॉडेल्स' म्हणजे आई आणि बाबा. आईबाबा मुलांशी कसे वागतात, आईबाबा मुलांच्या देखत एकमेकांशी कसे वागतात, आणि आईबाबा मुलांदेखत इतरांशी कसे वागतात, या सर्व वागण्याच्या पद्धती म्हणजे मुलांसाठी व्यक्तीमत्व विकासाचे धडे असतात. या प्रक्रियेला विकास म्हणण्यापेक्षा खरे तर व्यक्तिमत्त्वाची घडण असे म्हणणं अधिक अर्थपूर्ण होईल. मुलं शिकतात कशी..? हा एक मुळातूनच समजून घेण्याचा विषय आहे. एखादी घटना पाहणे, अनुभवणे, ती समजून घेणे, तिचा अर्थ लावणे, आणि नंतर तसाच प्रसंग जेव्हा त्यांच्या आयुष्यात घडेल, तेव्हा त्याला तोंड देताना, मागच्या प्रसंगात मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करणे, अशी ही प्रक्रिया असते. एका उदाहरणाने ही गोष्ट अधिक स्पष्ट होईल.
नऊ वर्षांच्या अभिजीतच्या बाबांच्या मित्राला त्यांच्या मदतीची गरज होती. त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादात, त्यांची बाजू मांडून मध्यस्थी करण्यासाठी, त्यांनी अभिजीतच्या बाबांची मदत मागितली. बाबांनी होकार दिला, आणि या रविवारी आपण जाऊ म्हणून कबूल केले. पण त्याचवेळी बाबांना आपण अभिजीतला दिलेल्या प्रॉमिस चा विसर पडला. रविवारी आपण जवळच्या किल्ल्यावर पिकनिकला जाऊ, असे प्रॉमिस बाबांनी अभिजीतला आणि त्याच्या आईला केले होते. पण चुकून, त्यांनी मित्रालाही, त्याच रविवारची सकाळची वेळ दिली. मग ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळीच त्या काकांचा फोन आला. घरात त्यावेळी पिकनिक ची तयारी चालू होती. मोबाईल मध्ये त्यांचा फोन आलेला पाहून, बाबांना, झालेला गोंधळ लक्षात आला. मग त्यांनी काय केले...?
प्रथम, त्यांनी आलेला फोन अभिजीतच्या आईला घ्यायला सांगितला. अभीचे बाबा टॉयलेट मध्ये आहेत, दहा मिनिटांनी फोन करतील असे सांगायला सांगितले. मग त्यानंतर त्यांनी अभि, आणि त्याची आई यांना, झालेला गोंधळ, व्यवस्थित विश्वासात घेऊन सांगितला. स्वतःची चूक कबूल करून, त्याबद्दल सॉरी म्हटले. आणि आपल्या पिकनिकपेक्षा, काकांचं काम कसं महत्त्वाचं आहे, हे त्यांना समजून सांगितलं. अभि अगोदर नाराज झाला, पण पुढच्या रविवारचं प्रॉमिस मिळाल्यानंतर राजी झाला. मग बाबांनी मित्राला फोन करून त्यांचा पुढचा कार्यक्रम ठरवला.
आता या प्रसंगातून, अभिजीत काय काय शिकला असेल? अनेक गोष्टी आहेत. अशा प्रसंगांची नोंद आपल्या मेंदूत, नेणीवेच्या पातळीवर होत असते. अभिजीतने शिकलेल्या गोष्टींपैकी, पहिली गोष्ट म्हणजे, आपल्या हातून काही चूक झाल्यास, ती कबूल करावी. अजिबात लपवू नये. दुसरी गोष्ट म्हणजे, झालेली चूक निस्तरण्यासाठी, आपल्या माणसांकडे मोकळ्या मनाने मदत मागावी. संकोचू नये. तिसरी गोष्ट म्हणजे, घरात दिलेला शब्द महत्त्वाचा असतोच, पण समाजात दिलेल्या शब्दाला कधी कधी जास्ती महत्त्व द्यावे लागते.
थोडा बारकाईने विचार केल्यास, असे लक्षात येते की, यातल्या काही गोष्टी फारच महत्त्वाच्या आहेत. गंभीर आहेत. वरील प्रसंग जरी छोटासा असला, तरी त्यातल्या काही गोष्टींमुळे मिळणारा धडा, हा आयुष्यामध्ये, अतिशय गंभीर अशा समस्या सोडवताना, योग्य पद्धतीने विचार करण्याची, आणि वागण्याची सवय लावणारा आहे. गेल्या काही वर्षात, शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणात, ही गोष्ट महत्त्वाची होती. या मुलांच्या घरातील वातावरण असे असावे की, त्यांना तशी मदत मागण्याची हिंमतच झाली नसावी. किंवा त्यांना तशी खात्री वाटली नसावी. स्वतःची चूक कबूल करणे, आपण अडचणीत असताना आपल्याच माणसांकडे न घाबरता मदत मागणे, अशा सवयी माणसाला संकट काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे मदतीच्या ठरू शकतात. मदत मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, असं वाटल्यासच माणूस अगदी अगतिक होतो. आणि तेव्हाच तो आत्महत्या सारख्या गंभीर पर्यायाची निवड करण्याची शक्यता निर्माण होते.
______________________________
-- *विवेक दसरे.*
*मानसतज्ञ.*
*मार्ग इन्स्टिट्यूट फॉर सेल्फ डेव्हलपमेंट,*
*अहमदनगर.*
*9881659901*