10/04/2020
कोरोना नंतरचे आपले औद्योगिक क्षेत्र | भाग 1
"तसे पाहिले तर कोणत्याच अत्यावश्यक सेवेत आमचा उद्योग येत नाही...परंतु आम्ही सध्या चालू असलेल्या व नवीन येत असलेल्या प्रोजेक्टनी ओव्हर लोड असणार आहोत... मंदीतही..."
2008 च्या जागतिक मंदी नंतर आलेली ही जागतिक महामंदी आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये प्रगत राष्ट्रे चांगलीच भरडली जात आहेत. जिकडे तिकडे फक्त हीच चर्चा आहे. परंतु एक उद्योजक, एक नागरिक, एक कर्मचारी म्हणून कोरोना नंतर पुढे काय याचा विचार करणे गरजेचे आहे. आर्थिक मंदीचे सावट असताना प्रथम आपण आणि नंतर आपला समाज कशा प्रकारे यामधून लवकरात लवकर बाहेर पडू याचा विचार करणे गरजेचे आहे. आता सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पादन, औषधे, अत्यावश्यक गोष्टी इ. उद्योग वगळता बाकी उद्योग ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत तग धरलेले किंवा वाढत असलेले उद्योग म्हणजे इ-कॉमर्स मार्केट, मनोरंजन-गेमिंग, विडिओ कॉन्फरन्सिंग, किराणा माल व त्याचे दळण-वळण, औषध उद्योग इ. उद्योग चालू आहेत किंवा संधी उपलब्ध होत आहेत.
आर्थिक मंदी मुळे किंवा साथीच्या रोगामुळे मागे पडत चाललेले उद्योग म्हणजे विमान, पर्यटन, गुंतवणूक, शेअर मार्केट, कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट, ट्रान्सपोर्ट, हॉटेल उद्योग,मॉल, फर्निचर, गाड्या, सिमेंट, मटेरियल, energy कंपनी, प्रिंटिंग, उत्पादन क्षेत्र इ. मधील उद्योगांवर सध्या मंदीचे सावट आहे. परंतु बँक, शिक्षण, आरोग्य इ. क्षेत्रामध्ये रिकव्हरी होऊ शकते. भारताची अर्थव्यवस्था ही छोटे व्यापारी, शेतकरी, मजूर इ. चालवतात. कॉर्पोरेटचा वाटा यात फार कमी आहे. जर वरील लोकांच्या हातात खर्च करायला पैसा आला नाही तर मंदीचे परिणाम दिसू लागतात. अशा परिस्थितीत लोक पैसा नेहमीच्या मार्गाने खर्च न करता अत्यावश्यक गोष्टी व बचत करतात. यामुळे मार्केट मध्ये पैसा न खेळल्यामुळे मंदी आणखी तीव्र होते.
सध्या बँक व नॉन-बँकिंग क्षेत्र, कॉर्पोरेट आणि लघु, कुटिरोद्योग हे संकटात आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेची सुधारणा करायची असेल तर निर्यात, परकीय गुंतवणूक आणि आपला पैसे खर्च करणे म्हणजेच मार्केटला आणणे हे उपाय करावे लागतील. आपण यामधून लवकर बाहेर पडू अशी शक्यता आहे कारण सध्या जगजाहीर असलेल्या "चीन मुळे व्हायरस आला" यामुळे बरेच देश हे manufacturing हब असलेल्या चीनवर नाराज आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे कोरोनाच्या उल्लेख चायनीज व्हायरस असा करतात, याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्याला या गोष्टीचा फायदा manufacturing मध्ये होऊ शकतो. भारताकडे चांगली क्षमता आहे त्यामुळे चीन सोबत तुलना करता आपण उत्पादन क्षेत्रात चांगले काम करून आपली अर्थव्यवस्था बळकट करू शकतो. उत्पादन करण्यासाठी भारताला परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर मिळू शकते. लहान उद्योजक हे मोठ्या उद्योजकांना वस्तू व सेवा पुरवत असल्यामुळे अर्थव्यवस्था सुधारण्यास वेळ लागणार नाही. योग्य नियोजन जर झाले तर फार मोठ्या संधी आपल्याला मिळू शकतील, अर्थात यासाठी मोठा वेळ जावा लागेल.
माझा वैयक्तिक उद्योग पहिला तर आम्ही Energy Company चालवतो. तसेच एक manufacturing industry चालवतो. मी सोलर इलेक्ट्रिसिटी या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात कन्सल्टंट, इंस्टॉलर, गुंतवणूकदार म्हणून काम करतो. तसे पाहिले तर कोणत्याच अत्यावश्यक सेवेमध्ये आमचा उद्योग येत नाही. म्हणजे प्राथमिक चित्र असे दिसते की, लॉक डाऊन संपल्यावर महत्वाचे उद्योग रिकव्हर होत जातील आणि शेवटी सोलर उद्योग रिकव्हरी चालू करेल. कारण सोलर अत्यावश्यक सेवेत येत नाही. परंतु हे चित्र फार वेगळे आहे. आम्ही सध्या चालू असलेल्या प्रोजेक्ट आणि नवीन येत असलेल्या प्रोजेक्टनी ओव्हर लोड आहोत. आज महाराष्ट्रातील विजेची मागणी पंचवीस हजार मेगावॉट वारून पंधरा हजार मेगावॉट वर आली. चंद्रपूर येथील थर्मल पॉवर स्टेशनने शट डाऊन घेतला. म्हणजेच प्रदूषण करणारे विजकेंद्र काही काळासाठी बंद केले. कित्येक सोलर प्लांट दिवसभर स्वच्छ वीज तयार करून ग्रीड ला देत आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा, विजेचे दर वाढत आहेत आणि वीज ही अत्यावश्यक आहे त्यामुळे बिल आज ना उद्या भरावेच लागणार आहे. हीच वीज सोलरची वापरली तर बिलमध्ये बचत होते. आज इतर उद्योग जरी संथ झाले असतील तरी हॉस्पिटल्स, औषध निर्मात्या कंपनी, इंटरनेट व मनोरंजन, सर्वर कंपनी, घरगुती व शेती यासाठी विजेची मागणी आहेच आणि वाढतच आहे. आमचे बरेच ग्राहक हे हॉस्पिटल, शेतकरी, फार्मा कंपनी, सोसायटी असे आहेत. याचबरोबर काही बँक सोलर ग्राहकांना कर्ज देतात त्यामुळे बँकिंग क्षेत्राला सोलरचा अप्रत्यक्ष फायदा होतो. या बरोबर स्टील उद्योग, PVC, केबल, इलेक्ट्रिक कंपोनंट, ट्रान्सपोर्ट इ. उद्योगांना सोलरचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा होतो.
सध्या मंदीच्या सावटामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी पैसा बचत करून ठेवला आहे. हा पैसा सुरक्षितरीत्या गुंतवण्यास हे गुंतवणूकदार आजही इच्छुक आहेत. वीजबिल कमी करण्याच्या दृष्टिकोनातून बसवण्यात येणाऱ्या सौरप्लान्ट साठी असे गुंतवणूकदार गुंतवणूक करून चांगला परतावा प्राप्त करतात. याचबरोबर सरकारी योजनेतून होणारे अनुदानित कृषिपंपाचे वाटप इ. कामे ही दीर्घ काळासाठी चालूच राहतात. तसेच सेंट्रल govt. हे सोलर ही स्वच्छ ऊर्जा म्हणून प्रमोट करत असते. फक्त महाराष्ट्राचा विचार केला असता लहान उद्योजकांसाठी सोलर इंडस्ट्री ही तीन हजार कोटी (3000 कोटी) इतकी मोठी आहे. आज विनागुंतवणूक सौर प्लांट बसवून विजबिलमध्ये बचत करू शकणाऱ्यांचा सर्वे केला, त्यांच्या पर्यंत योग्य माहिती पोहोचवली तर प्रचंड प्रमाणात सौर प्लांटची मागणी वाढू शकते. इतक्या संधी उपलब्ध आहेत. भविष्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांमुळे सोलर विजेची मागणी आणखी वाढू शकते. त्यामुळे गुंतवणूकदार, सामान्य उद्योजक हे एक उद्योग म्हणून सोलर इंडस्ट्रीकडे वळण्याचा विचार करू शकतात.
© Vikram V. Chavan
Managing Director
Imperium Solar Development India Pvt. Ltd.