23/01/2025
--- या नव्या वर्षाच्या स्वागताला आम्ही पंढरपुरी होतो, तिथून आल्यावर बोलावणं होतं ते या ९८ वर्ष अविरतपणे सामाजिक कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध 'श्रद्धानंद महिला आश्रमाच्या' वार्षिकोत्सवात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचं... सोबत प्रमुख पाहुण्या होत्या विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि अर्थतज्ज्ञ डॉ.रोहिणी केळकर..
समाजानं ज्यांचं अस्तित्व नाकारलं, तसंच ज्यांना अपत्य होऊनही त्यांचं संगोपन करणं शक्य होतं नाही, किंवा इतर काही कारणांमुळे ज्या आपल्या कुटुंबाला पारख्या झाल्या आहेत अशा अनेक निरागस मुली-महिलांसाठी खंबीरपणे उभी राहिलेली ही संस्था म्हणजे त्यांचा आधारवड आहे.. अत्यंत निरलसपणे आणि सहृदयतेने हे पुनर्वसन कार्य सुरू करणाऱ्या 'स्वामी श्रध्दानंद' यांना 'शांतताप्रिय' समाजातील एका 'माथेफिरूच्या' हातून निर्घृण मृत्यू आला.. पण हे 'अतिमहत्त्वाचं' असणारं काम थांबलं नाही..त्याला समाजातील काही सजग नागरिकांनी आपल्या कष्टांची जोड देऊन गेली इतकी वर्षे अव्याहतपणे सुरू ठेवलं आहे.. अनेक संवेदनशील प्रज्ञावंतांच्या कामाला जेव्हा करुणेची किनार मिळते, तेव्हाच असं मोठ्ठं कुटुंब उभं राहू शकतं..
या सर्व आश्रमकन्या व्यवस्थित अद्ययावत शिक्षण घेतात, आई / भावंडं जशी माया करेल तशी एकमेकांना लावतात, वेगवेगळ्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणातून आणि अभ्यासक्रमात मनापासून स्वतःला झोकून देतात, नोकरीच नाही तर स्वतःचा व्यवसाय सुरु करून सक्षम होतात, यथावकाश लग्न करून आपापल्या घरी नांदायला जातात, पण त्यांच्या मंगळागौरी पासून ते बाळंतपणांपर्यंत सगळं "माहेरपण" ही संस्थाच करते आणि गरज पडल्यास त्यांच्या मुलांचाही सांभाळ करते..
तिथल्या आश्रमकन्यांशी एक थोडीशीच मोठी असणारी "ताई" म्हणून मला भरपूर गप्पा मारता आल्या, विविध करिअर बद्दल, ती कशी निवडावी यांबद्दल आणि येत्या महिन्यातल्या बोर्डाच्या परीक्षांबद्दल आम्ही खूप काही बोललो, हसलो आणि जोडल्या गेलो!..
या मुलींच्या रुपात असलेला हा उत्साहाचा, सर्जनशीलतेचा झरा असाच निर्मळपणे अखंड वाहत राहो.. अशा मनोमन सदिच्छा!!..
||जय हरी विठ्ठल||