23/05/2019
आता जे कुणी निवडून येतील त्यांनीच पाच वर्षे केंद्रातील सरकार चालवायचे आहे, त्यावर आपले म्हणजे शेतकऱ्यांचे काहीही नियंत्रण असणार नाही. कारण सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवता येईल इतका प्रभावशाली दबावगट या देशात शेतकऱ्यांचा नाही.
आता सत्ता कुणाचीही येवो, मोदी, पवार, मायावती, ममता, अखिलेश, चंद्राबाबू अथवा अन्य कुणीही सत्तासीन झाले तरी शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्याची शक्यताच नाही.
हा निवडून यावा कि तो निवडून यावा यासाठी सामान्य शेतकरी, शेतकरी भाडखाऊ पोरं जो जीवाचा आटापिटा करतात, तोच चुकीचा आणि पूर्ण व्यर्थ आहे. यांच्या कुणाच्याही आटापिट्याचा शासनावर कधीच दबाव येत नाही, हे माझ्या आज पर्यंतच्या अनुभवावरून सांगू शकतो. निवडणुकीपूर्वीचा पक्ष आणि नेता सत्ता मिळाली कि बदलून गेलेला असतो.
यापूर्वीही शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताच पक्ष नव्हता आणि आजही नाही. कारण शेतीची लूट करत महागाईवर नियंत्रित केल्याचे नाटक आजपर्यंत प्रत्येक सत्ताधाऱ्याने केले आहे. कोणत्याच सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केलेले नाही. शेतकऱ्यांच्या लुटीवर हा देश चालतो. आणि आज पर्यंत एखाद्या सरकारने कधी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जरी असला तरी शेतकरी कृतज्ञतेने त्या पक्षाच्या बाजूने उभा राहात नाही. शेतीच्या भल्याचे निर्णय घेणारा पक्ष किंवा राजकीय नेता सत्तेतून बाहेर होतो.... हे दुर्दैवी आणि दाहक वास्तव आहे. हे वास्तव स्वीकारण्याची हिंमत शेतकऱ्यांनी दाखवली तरच पुढील रणनीतीचे आणि उपाययोजनांचे मार्ग खुले होऊ शकतात.
शेतीला आणि शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी दबावगट निर्माण केला पाहिजे. शासनावर दबाव वाढण्याइतपत शेतकऱ्यांची संघटना मजबूत आणि ताकदवर झाली पाहिजे. कोणत्याही मुद्यावर शासनावर दबाव टाकणाऱ्या इतर दबावगटापेक्षा शेतकऱ्यांचा दबावगट मोठा असेल तरच शेतकरी आपल्याला हवा तसा अनुकूल निर्णय घेण्यास शासनाला भाग पडू शकते. अर्थातच सरकार कुणाचे येते, पंतप्रधान कोण होतो याला शेतीस्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून फारसे काही महत्व नाही. शेतकऱ्यांचे नव्हे तर स्वतःचे हितसंबंध जोपासू पाहणाऱ्या शेतकरी नेत्यांना आणि संघटनांनाच अमूक एक पक्ष सत्तेवर आला तर फायदा होतो आणि तो पक्ष पराजित झाला तर नुकसान होते. हेही स्वच्छ मनाने आपण समजून घेतले पाहिजे.
सत्तेवर कुणीही येवो... त्यालाच ऐरणीवर ठेवून ठोकून, पिटून, पिरगाळून आपल्याला हवे तसे त्याला "सरळ" करण्याची मनगटी ताकद जोपर्यंत शेतकरी दाखवत नाही तोपर्यंत शेतीला "अच्छे दिन" येऊच शकणार नाहीत. पाय चुकला तर चालेल पण उपाय चुकता कामा नये, इतकी समज आणि प्रगल्भता शेतकऱ्यांमध्ये येईल, त्यादिवसापासून शेतीच्या स्वातंत्र्याच्या लढाईला सुरुवात होईल. शेतीला सहजासहजी कोणताच पक्ष आर्थिक स्वातंत्र्य बहाल करणार नाही. जे मिळवायचे ते शेतकऱ्यांना स्वतःच्या ताकदीवरच मिळवायचे आहे.
Call now to connect with business.