25/03/2025
प्रत्येकाच्या आयुष्यात एक ट्रिगर पॉईंट असतो...
तुम्ही तुमचे काम मन लावून करत असाल, कामात सातत्य असेल तर अपेक्षित यश मिळत नाही म्हणून निराश होऊ नका, तुमची वेळ कधीतरी येणार आहेच... फक्त धरसोड वृत्ती ठेऊ नका आणि इतरांशी तुलना करू नका...
धंद्यात दिवसभरात मिळणारा २४ तासांचा वेळ सोडला तर प्रत्येकाला मिळणारी संसाधने (Resources) वेगवेगळी असतात. पैसा, पाठिंबा, सहकार्य, अनुभव, नेटवर्क, वारसा प्रत्येक गोष्ट वेगवेगळीच असते, त्यामुळे प्रत्येकाचे यशाचे प्रमाण कमीजास्त होत असते, अगदी काम सुरु केल्यांनतर सुद्धा समोर येणाऱ्या संधी, कौशल्ये, सोबत येणारे सहकारी किंवा कामाची पद्धत या गोष्टींमध्ये सुद्धा तफावत आते ज्यामुळे प्रत्येकाचा पुढे जाण्याचा वेग कमी जास्त होत असतो, आणि यापेक्षाही महत्वाचं असतं ते वेळेचा योग्य वापर कोण जास्त करतो, वेळ हि एकमात्र अशी गोष्ट आहे जी या सगळ्या गोष्टींमधील दरी भरून काढू शकते... त्यामुळे आपण कुणाशी आपली तुलना करणेच गैर असते.
प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कुणाला कमी कालावधीत यश मिळतं कुणाला थोडा वेळ जास्त लागतो, कुणाला कमी वयात यश मिळतं तर कुणाला आयुष्य खर्ची घालावं लागतं, पण कामात सातत्य असेल तर कुठेतरी जाऊन तो ट्रिगर पॉईंट भेटतो जो तुम्हाला वेगाने पुढे ढकलून मागची सगळी कसर भरून काढतो... आणि मग एका टप्प्यावर गेल्यावर जाणवतं कि ठीक आहे, थोडा उशीर झाला पण आता सगळं अपेक्षेप्रमाणे चालू आहे... फक्त तुमचा मार्ग योग्य असला पाहिजे..
व्यावसायिक आयुष्यात आपण सगळे वेगवेगळे आहोत, असापळ्या सर्वांची कौशल्ये वेगवेगळी आहेत, आपल्या सर्वांना मिळालेले Resources वेगवेगळे आहेत पण तरी आपण एका अंत नसलेल्या रस्त्याने चाललो आहोत, जितके पुढे जाऊ तितके नवीन काहीतरी बघायला अनुभवायला मिळेल असा हा रस्ता आहे... या प्रवासात कोण पुढे आहे, कोण मागे आहे याचा विचार करण्याची गरज नाही... कित्येक जण तो रास्ता आधीच पार करून गेलेले आहेत, कित्येक जण आत्ताच त्या प्रवासाला सुरु करत आहेत, तुम्ही काहींना मागे टाकून पुढे जाणार आहात, काही जण तुम्हाला मागे टाकणार आहेत, महत्वाचे आहे आपण या प्रवासाचा आनंद किती घेऊ शकतो... कारण फक्त रस्त्याच्या क्षितिजावरच्या End Point पर्यंत नजर ठेऊन कितीही काळ गाडी चालवत राहिलात तरी एका कालावधीनंतर जाणवेल कि एवढा प्रवास केला पण आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी बघायच्या राहून गेल्या...
कामात सातत्य ठेवा, मन लावून काम करत रहा, आणि या प्रवासाचा आनंद घ्या... कामात सातत्य असेल एक ट्रिगर पॉईंट प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतो हे लक्षात ठेवा...
व्यवसाय साक्षर व्हा...
_
© श्रीकांत आव्हाड उद्योजक मित्र - Udyojak Mitra
==================