19/05/2026
एक काळ होता, बाजारपेठेला सकाळी उठल्यावर एक ठराविक लय असायची.
दुकानांची शटर उघडायची, कारखान्यांच्या सायरन वाजायच्या, ट्रक रस्त्यावर धावायचे आणि शहरांच्या नसा जणू व्यापाराच्या गतीनं धडधडायच्या. माणूस भविष्याची स्वप्नं पाहत होता, उद्योग विस्तारत होते आणि “उद्याचा दिवस आजपेक्षा चांगला असेल” हा विश्वास अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी होता. पण गेल्या काही वर्षांत जगाने अशी वळणं घेतली की स्थैर्य हा शब्दच दुर्मिळ वाटू लागला.
एका अदृश्य विषाणूनं संपूर्ण व्यवस्थेला गुडघ्यावर आणलं. त्यानंतर युद्धं, इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतील अडथळे, बदलती सरकारी धोरणं, वाढती महागाई आणि बाजारातील अनिश्चितता या सगळ्यांनी आर्थिक व्यवस्थेचा चेहरामोहराच बदलून टाकला. आज परिस्थिती अशी आहे की, मेहनत असूनही हमखास यशाची खात्री उरलेली नाही आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करणारा माणूसच सर्वाधिक असुरक्षित वाटू लागला आहे.
भारतीय समाजात उद्योजकाला नेहमी “धाडसी माणूस” म्हणून पाहिलं गेलं.
कारण नोकरी करणारा माणूस स्वतःचं आयुष्य सांभाळतो; पण उद्योजक स्वतःसोबत अनेक कुटुंबांची जबाबदारी उचलत असतो. त्याच्या निर्णयांवर कामगारांच्या चुली पेटतात, बाजारपेठा चालतात आणि शहरांच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते.
मात्र आज हाच उद्योजक एका अभूतपूर्व वादळाच्या मध्यभागी उभा आहे. समस्या फक्त मंदीची नाही, तर अनिश्चिततेची आहे. कोणता निर्णय उद्या फायद्याचा ठरेल आणि कोणता व्यवसाय एका रात्रीत संकटात येईल, याचा अंदाज कुणालाच लागत नाही. बाजारात पैसा फिरतोय, पण विश्वास फिरताना दिसत नाही. व्यवहार सुरू आहेत, पण स्थैर्य हरवलं आहे. आणि म्हणूनच आजचा काळ हा केवळ आर्थिक संकटाचा नाही, तर उद्योजकांच्या सहनशक्तीची, मानसिक ताकदीची आणि अस्तित्व टिकवण्याच्या संघर्षाची कठीण परीक्षा ठरत आहे.
आजचा उद्योजक एका विचित्र वळणावर उभा आहे.
समोर बाजार आहे, पण ग्राहकांचा आत्मविश्वास हरवलेला आहे.
हातात व्यवसाय आहे, पण भविष्याचा नेमका अंदाज लागत नाही.
मेहनत आहे, जिद्द आहे, अनुभव आहे… पण परिस्थिती मात्र रोज नवा घाव घालत आहे.
कोव्हीडनंतर जग पूर्ववत झालं, असं वरवर वाटत असलं तरी अर्थव्यवस्थेच्या आत खोलवर अनेक जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. कोविड काळात अनेक उद्योग बंद पडले, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, ग्राहकांची खरेदी क्षमता कमी झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारातील “विश्वास” हादरला. व्यवसाय हा केवळ पैशावर चालत नाही; तो विश्वासावर चालतो. आणि हाच विश्वास आज सर्वाधिक डळमळीत झालेला दिसतो.
आज महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम उद्योजक सर्वात मोठ्या संकटात आहेत. मोठ्या कंपन्यांकडे भांडवल आहे, बँकांची साथ आहे, तंत्रज्ञान आहे, सरकारपर्यंत पोहोच आहे. पण छोटा उद्योजक ? तो आजही EMI, दुकानभाडं, वीजबिल, GST, कामगारांचा पगार आणि रोजच्या खर्चाच्या चक्रात अडकलेला आहे.
त्याला बाजारात टिकण्यासाठी रोज स्वतःशीच युद्ध करावं लागत आहे.
गेल्या काही वर्षांत इंधन दरवाढीनं वाहतूक खर्च प्रचंड वाढवला. गॅस टंचाईमुळे उत्पादन क्षेत्राला मोठा फटका बसला. कच्चा माल महाग झाला. ग्राहक मात्र अजूनही “जुने दर” अपेक्षित धरून बसले आहेत. परिणामी उद्योजक नफा कमावणं तर दूरच, पण व्यवसाय टिकवण्यासाठी धडपड करताना दिसतो आहे.
याहून मोठी समस्या म्हणजे सरकारी धोरणांतील सततची अनिश्चितता. आज एखाद्या नियमात बदल होतो, उद्या नवीन कर येतो, परवा नवीन परवाना लागू होतो. छोटा व्यावसायिक नियम समजून घेण्यातच थकून जातो. सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या, ऑनलाईन प्रक्रियेतील गुंतागुंत, वाढती कागदपत्रं आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण हा आजच्या उद्योजकाचा न बोलला जाणारा संघर्ष आहे.
एकेकाळी व्यवसाय म्हणजे स्थैर्य मानलं जायचं.
आज व्यवसाय म्हणजे अनिश्चिततेशी रोजचा सामना झाला आहे.
ग्राहकांचं वर्तनही बदललं आहे.
लोक आता खर्च करण्याआधी दहा वेळा विचार करतात. आवश्यक गोष्टींवरच पैसे खर्च होतात. लक्झरी, ब्रँड, प्रतिष्ठा यापेक्षा “गरज” महत्त्वाची झाली आहे. ऑनलाईन मार्केटनं स्थानिक बाजारपेठेवर प्रचंड दबाव निर्माण केला आहे. मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या सवलतींचा पाऊस पाडतात आणि छोटा दुकानदार त्यांच्यासमोर असहाय्य ठरतो.
या सगळ्यात सर्वाधिक दुर्लक्षित घटक कोणता असेल तर तो म्हणजे उद्योजकाची मानसिक अवस्था !
कारखाना बंद झाला तर मशीन दिसतात. दुकान बंद झालं तर शटर दिसतं पण आतून तुटलेला उद्योजक कुणालाच दिसत नाही.
रात्रभर जागून आकडे मांडणारा, कामगारांचा पगार वेळेवर व्हावा म्हणून स्वतःच्या गरजा थांबवणारा, कर्ज फेडण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणारा उद्योजक आज मानसिकदृष्ट्या थकलेला आहे. समाजाला त्याची उलाढाल दिसते ; पण त्यामागची घालमेल दिसत नाही.
आजच्या काळात उद्योजकाला फक्त आर्थिक मदतीची गरज नाही, तर स्थिर धोरणांची, विश्वासार्ह बाजारपेठेची आणि सामाजिक समजुतीची गरज आहे. उद्योग हा केवळ पैसा कमावण्याचा मार्ग नाही; तो रोजगार निर्माण करतो, कुटुंबं उभी करतो, शहरं चालवतो आणि अर्थव्यवस्थेला गती देतो.
उद्योजक वाचला तरच बाजार वाचेल, बाजार वाचला तरच रोजगार वाचेल, आणि रोजगार वाचला तरच देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहील ; पण या अंधारातही एक गोष्ट आशादायक आहे ती म्हणजे भारतीय उद्योजकाची जिद्द.
हा माणूस पडतो, तोटा सहन करतो, फसतो, कर्जबाजारी होतो… पण पुन्हा उभा राहण्याचं धैर्य सोडत नाही. कारण उद्योजकता ही फक्त व्यवसाय नसते; ती जगण्याची वृत्ती असते.
आजचा काळ कठीण आहे, हे वास्तव आहे ; पण प्रत्येक संकट एक नवीन अर्थव्यवस्था जन्माला घालत असतं. जग बदलत आहे. बाजार बदलत आहे. ग्राहक बदलत आहेत. या बदलात जो स्वतःला बदलायला तयार असेल, तोच उद्याचा खरा उद्योजक ठरेल.
उद्योजकांनी आता फक्त नफ्याचा विचार करून चालणार नाही. तंत्रज्ञान, डिजिटल उपस्थिती, ग्राहकांशी नातं, दर्जा, विश्वास आणि नवकल्पना या गोष्टी भविष्यातील व्यवसायाचा पाया ठरणार आहेत.
हा काळ कदाचित इतिहासात “अनिश्चिततेचा काळ” म्हणून ओळखला जाईल.
पण कदाचित हाच काळ नव्या भारतातील सर्वात जिद्दी उद्योजक घडवणारा काळही ठरेल.
✍️ विजय गोपाळराव पवार
लेखक- बाराखडी उद्योजकतेची