08/06/2025
हगवणे कुटुंब हा 'मराठा समाजाचा चेहरा' का बनवता?
(माझ्या लेखणीतून.. )
हुंडाबळी सारखा प्रकार जेव्हा कोणत्याही समाजात घडतो तेव्हा तो निंदनीयच असतो. परंतु लग्न सोहळ्यां मधिल अनावश्यक डामडौल हा जणूकाही काही समस्त मराठा समाजालाच जडलेला रोग आहे असे भासवले जात आहे.
बोटावर मोजण्याइतकेच गुंठा मंत्री, खोट्या राजकीय प्रतिष्ठेला जपणारे तथाकथित पुढारी व वाम मार्गाने तुंबड्या भरून प्रतिष्ठा मिरवणारे महाभाग सोडले तर आजही बहुसंख्य मराठा समाज हा गावातल्या मंदीरा बाहेर मांडव टाकुन, वरण भातावरच लग्नाच्या पंगती उठवत आहे.
अर्थात मुठभर धनदांडग्यांचा माज हा सकल मराठा समाजाशी जोडणे गैर आहे.
वास्तविकतेपासून आम्ही कायम लांब राहतो. खरी समस्या ही आहे की, अशा भव्य दिव्य लग्न सोहळ्यांना राजकारणीच प्रतिष्ठा देतात. एखाद्या गावातल्या मंदिरा बाहेरील साध्या लग्न सोहळ्यात राज्यातील किती नेते हजेरी लावतात? अर्थात खोटी प्रतिष्ठा व मोठेपणा या मानसिक रोगाला खतपाणी कोण घालत?
त्यातच एक "श्रीमंत - अतिभिकारी" वर्ग तयार झाला आहे. ही मंडळी वरकरणी धनाढ्य असली तरीही ईतकी भिकारी असतात की,त्यांची हुंड्याची व इतरांच्या शोषणाची भुक कधीच भागत नाही. त्यातच ते पशू हिंसक होतात. पण हे काही एका समाजात होते का? नाही.. तर हा रोग सर्व व्यापक आहे. त्या रोगाचे मुळ हे पैशाचा लोभ, खोटी प्रतिष्ठा हाच आहे.
असो मुद्दा एकच, बांधावर गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमधे बहूसंख्य मराठा आहे! बळीराजा बनून अन्न धान्य पिकवणारा देखील बहूसंख्य मराठा आहे!!
तेव्हा गुंठ्याच्या पैशांवर माजलेल्या भुतावळीचा आमचा समंध नाही व तो मराठा समाजाचा चेहरा देखील नाही.
सबब प्रबोधन करून,चुकीच्या रूढी परंपरा बंद करणे ही समज मराठा समाजाला नक्कीच येईल. पण पैशासाठी पिसाळलेल्या जनावरांवर याचा फार परिणाम होणार नाही हे मात्र नक्कीच!!
माउली दारवटकर
राष्ट्रशक्ती संघटना
पुणे.