12/05/2026
एक कमेंट आली होती,शक्यतो अशा उत्तर देणा-या पोस्ट लिहित नाही पण 'इनर चाइल्ड हिलिंग' शिकवते,या नात्यानं,वाचकांसाठी आणि कोर्स केलेल्या विद्यार्थिनींसाठी रिविजन असं उत्तर लिहिते आहे.समुपदेशन आणि डॉक्टरांच्या मदतीला पर्याय म्हणून ही पोस्ट वाचू नये फक्त माहिती म्हणून वाचावी.
निमित्त आहे ही कमेंट!
व्यक्तीशः कोणाला मार्गदर्शन करण्यासाठी ही पोस्ट नाही,विषय पेजवर यावा म्हणून लिहिते आहे,युट्युब वर खरं तर त्यांनी हा प्रश्न सर्च केला असता तर त्यांना व्हिडिओ मिळाले असते,असो.
#कमेंट
(पोस्ट :आई म्हणजे)
नेहमी नियमित मी तुम्हाला वाचते... खुप आवडतात लेख तुमचे, पण सगळ्यांच्या नशिबी ही "mother healing energy" नसते... काहींच्या नशिबी फार फार टॉक्सिक आणि तिरस्कारयुक्त मातृत्व आलेलं असतं,आयुष्यभराचा ट्रॉमा देतात ... खुप खुप वाईट अनुभव सोबतीला राहतात,मनापासून inner child हील करावं वाटत पण जोडीला तेवढे पैसे नसतात, सांसारिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक ताण यातून जमत नाही..आई या शब्दावरचा विश्वास उठावा इतका वाईट अनुभव आयुष्याने दिल्यावर नात तोडण हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो. अशा लोकांनीं काय करण अपेक्षित आहे त्यावर सुद्धा mother's day la नक्की सांगा.
#उत्तर
हा मोठा विषय आहे जो मी चार तास शिकवते त्यामुळे पोस्टमध्ये किती लिहिता येईल माहिती नाही लिहिण्याचा प्रयत्न करते आहे.
कमेंट मधे गैरसमज दिसतो आहे आणि तो इंटरनेटवरील अपु-या माहितीतून आलेला आहे, हेच होतंय आज-काल!
टाॅक्सिक -ट्रॉमा- इनर चाइल्ड !!!
हे सगळे शब्द तर परिचित होतात पण अपूर्ण ज्ञान हे अज्ञानापेक्षा घातक असतं.
कोण म्हणतं इनर चाइल्ड हील करायला पैसे खर्च करावे लागतात?
तुम्ही श्रध्दा आणि समर्पणानं,देवाला,युनिवर्सला आई-बाबा म्हणून हाक मारायला सुरुवात करा तुमच्या आतलं लहान मूल हिल व्हायला सुरुवात होईल,
कुणाची तरी निस्वार्थ सेवा करणं,
कुणाला तरी मदत करणं,हे सुद्धा हिलिंग आहे,
आतलं इनर चाइल्ड यानं बरं होतं.
स्वतःचा स्विकार करा,स्वतःची काळजी घ्या, स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करा,बालपणी ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत,त्या मिळवण्यासाठी धडपड करून त्या स्वतःला मिळवून द्या हे सुद्धा हिलिंग आहे.
आयुष्याची जबाबदारी घ्या,स्वतः स्वतःची आई व्हा,असं समजा की,आपल्या आत एक छोटी मुलगी आहे,जिच्यावर खूप अन्याय झालाय,ती खूप दुःखी आहे आणि ती मदत मागते आहे, तिच्याकडे पैसे नाहीत,बालपणीचे ट्रॉमा आठवून ती रडते आहे,इतरांकडे मदत मागते आहे.
तुमच्या आतल्या या छोट्या मुलीला तुम्ही काय मदत कराल?
हा विचार करायला सुरुवात करा,तिची जबाबदारी घ्या!एकदा तिला म्हणा की,
मी आहे,मी बघते.
आता तुम्हाला काय करावसं वाटतंय तिच्यासाठी?
तुम्ही काय करणं अपेक्षित आहे?
जुनी गोष्ट जुनं रडगाणं सोडून स्वतःच्या मेंदूला वेगळे प्रश्न द्या आणि विचारा की,
मी काय करू शकते?
मी काय करू?
भूतकाळातून बाहेर पडून मी स्वतःचं चांगलं भविष्य कसं निर्माण करू?
रडण्याची सवय लागली असेल तर मन पुन्हा पुन्हा जुन्या वळणावर जाईल,पण त्याला चांगल्या गोष्टीत रमवा,मंत्र म्हणा,सकारात्मक विचार करा, आजूबाजूच्या लोकांनी स्वतःच्या दुःखावर कशी मात केली?ते शिका.स्वावलंबी व्हा,स्वतःचे पैसे कमवा,आरोग्याची काळजी घ्या,म्हातारपणाची व्यवस्था करा.
आज कुणीतरी तुमच्या कमेंटला उत्तर देईल,तुम्ही किती जणांना ही गोष्ट ऐकवणार?लोक ऐकतील काहींचं मनोरंजन होईल,काही सहानुभूती देतील, पुढे तुम्हाला टाळतील कारण प्रत्येकाला आपापले ट्राॅमा आहेत!
आपण सगळे एक समजून घेऊयात की,आपल्या पालकांना पालक कसे असतात?हे शिकवणारे पालक,त्यांचे पालक ...अशा साखळीत आपण जन्माला आलेलो असतो,
त्यामुळे आपले आई-वडील आपल्याशी कसं वागले,याला व्यक्तिशः फक्त ते एकटेच जबाबदार नसून त्यांचा इतिहास त्यांचं बालपण,त्यांचं आयुष्य यासारख्या अनेक गोष्टींचा तो एकत्रित परिणाम असतो.
साधारणपणे माणसाचं अर्धं आयुष्य जगण्याचं भान येण्यात जातं,स्वतःच्या पायावर उभं रहाण्यात किंवा साधारणपणे नोकरी आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यातच अर्ध आयुष्य निघून गेलेलं असतं.
या वळणावर जेव्हा माणूस थकून जातो तेव्हा वेदनेतून मुक्त होण्यासाठी त्याला एक कारण हवं असतं ज्या कारणाला तो दोष देईल आणि त्या कारणावर सगळी जबाबदारी टाकेल.
बऱ्याचदा हे कारण आई वडील असतात, 'आई-वडिलांच्या निमित्तानं मिळालेलं दुःख' असं मुद्दाम इथे लिहिते आहे,कारण प्रत्येक माणसाला दुःख आहे आणि हे दुःख जिथून मिळतं ती कारणं प्रत्येकाची वेगळी आहेत,या जगात काही दुःखं अशी असतात ज्यांची कारणंच काही माणसांना शेवटपर्यंत सापडत नाहीत म्हणजे एखाद्या व्यक्तीला जन्मतः एखादा आजार असेल किंवा काही उणिव असेल तर तिने कोणाला दोष द्यायचा?
त्यामुळे दुःखाचं कारण माहीत असणाऱ्यांपैकी काही नशीबवान लोकांना कारण,आई-वडील आहेत,असं कळतं,एवढंच.
हे म्हणजे असं आहे की,समजा कोणी दगड फेकून मारला,तर तो ज्याने मारला त्याच्याविषयी आपण तक्रार करतो पण ज्याच्या डोक्यावर डोंगरावरून गडगडत आपोआप दगड पडला तो गपचूप चालायला लागतो,स्वतःच्या जखमेला औषध लावतो.
आपल्या आजूबाजूला स्वतःच्या जखमेला औषध लावणारी आयुष्यात पुढे जाणारी माणसं बघून सुद्धा आपण मात्र अजूनही वीस/पंचवीस/तीस वर्षांपूर्वी ज्यांनी आपल्याला जखमी केलं त्यांना दोष देत अजूनही रडत बसलो असू तर आपण आजूबाजूला बघत नाहीये आणि स्वतःचं दुःख कुरवाळत बसलो आहोत,असा याचा अर्थ होतो कारण आजूबाजूला बघितलं तर कळेल की अनेक जखमी माणसं स्वतःच औषध शोधून स्वतःला बरं करून मार्गी लागलेली आहेत.
जुनी जखम औषध न लावता तशीच ठेवणाऱ्याला दुसऱ्या शत्रूची गरजच नाही तो स्वतः स्वतःचा शत्रू आहे,जखम होणं ही एक घटना/अपघात आहे, पण ती तशीच ठेवणं,रक्त वाहू देणं हा आपला बेजबाबदारपणा आहे,
यामागे जगण्याविषयी असलेली शून्य कृतज्ञता हेच कारण आहे,जे गमावलं त्या ऐवजी जे मिळालं याकडे जर लक्ष गेलं तरच ही कृतज्ञता निर्माण होईल.
जन्मतः आई वडिल देवाघरी गेलेली,अनाथ मुलं आई-वडिलांनी टाकून दिलेली मुलं,कुमारी मातेनं नाईलाजास्तव सोडून दिलेली मुलं,गुन्हेगारांची, तुरुंगात जन्म घेणारी मुलं,शरीराची विशेष समस्या असणा-यांची,मनोरुग्ण आई-वडिलांची मुलं ज्यांना मुलं म्हणजे काय तेच माहित नाही अशा आई-वडिलांची मुलं सुद्धा स्वतःला सावरतात, हेच जगण्याचं वास्तव आहे.
निसर्गात आजूबाजूचे प्राणी बघा,आपल्या पिल्लांना मोठं करण्यासाठी निसर्गानं दिलेला रोल ते करतात आणि अक्षरशः विसरून जातात. माणूस प्राणी थोडा प्रगत आहे म्हणून त्याच्या अपेक्षा जास्त आहेत.
आई वडिलांनी जन्म दिला सुरुवातीच्या काळात आपल्याला जिवंत ठेवलं आणि आज आपण स्वतःच्या पायावर उभे आहोत,कर्तव्य संपलं विषय संपला! एवढंच अपेक्षित होतं आणि ते त्यांनी केलं,यासाठी आयुष्यभर कृतज्ञ रहायला काही हरकत नाहीये!
इथे आई-वडिलांना देव करून आपण देवाकडून करायच्या त्या अपेक्षा करायला लागतो पण सगळी माणसंच आहेत कुणी आधी जन्माला आलेली कोणी नंतर जन्माला आलेली!
स्वतःच्या आई-वडिलांकडे माणूस म्हणून बघायला सुरुवात करा,जशी जगात इतर माणसं असतात तसेच ते आहेत,आता तुम्हाला थोडसं नॉर्मल होता येईल.
काही शब्द देते आहे त्यांच्या मदतीने आयुष्य बदला.
🎯निर्णय
🎯निश्चय
🎯सकारात्मक विचार
🎯सर्वांना क्षमा
🎯आयुष्याची जबाबदारी
🎯स्वावलंबन
🎯कृतज्ञता
या मार्गावर चालून पहा,फरक पडलाच तर टाईम मॅनेजमेंट पेजला अशीच कमेंट लिहून,सकारात्मक बदल कळवा.
©कांचन दीक्षित